Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईसह कोकण परिसरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार

मुंबईसह कोकण परिसरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार
, गुरूवार, 10 जून 2021 (21:17 IST)
मुंबई शहर आणि उपनगरात आज (9 जून) सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.
 
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
 
पुढील 3 ते 4 तासांत या भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 
संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून मिठी नदीनेही पूररेषा ओलांडल्याची माहिती मिळत आहे. तसंच मुंबई परिसरात लोकल वाहतूकही ठप्प झाली आहे. शिवाय रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही संथगतीने होत असल्याचं दिसून येत आहे.
 
सकाळच्या तुलनेत दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून आलं. तरी वेधशाळेने पुढील काही तास सतत पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
सायंकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत 220 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. पुढील 2-3 दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
 
नदीने आपली पूररेषा ओलांडल्याने आसपासच्या परिसरात पाणी शिरू लागलं आहे. कुर्ला परिसरातील काही ठिकाणी तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे. हे या भागात दरवर्षी घडतं, अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने ANI वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
 
दादर (हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, गांधी मर्केट, अंधेरी, मालाड अशा काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर शीव ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सध्या ठप्प आहे.
 
चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकजवळ पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी मार्गावरील हार्बर रेल्वे सेवा सुद्धा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बल रेल्वे सेवा ठप्प असल्याने काही रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर प्रवाशांची गर्दी आहे.
 
कुलाबा वेधशाळेने मुंबई महानगर क्षेत्रात 10 ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबईत आजपासून मान्सून दाखल झाल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला मात्र अजून दोन दिवस लागतील, असा अंदाजही मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडचा आढावा घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं, "9 जूनपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होईल. 11 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा प्रभाव सर्वाधिक उत्तर कोकणात असेल.
 
मुंबई, ठाणे, रायगड या भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यासाठी नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे."
 
नुकतंच तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान कोकणात बघायला मिळालं. त्यामुळे या अतिवृष्टीसाठी सरकारकडून पूर्वनियोजन करण्यात आले आहे. यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 13,659 नवे कोरोना रुग्ण, 300 जणांचा मृत्यू