Publish Date: Sat, 06 Jun 2020 (09:18 IST)
Updated Date: Sat, 06 Jun 2020 (09:21 IST)
मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना बहुतांश कर्मचाऱ्यांना आता घरातूनच कामकाज करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय ई मेल सोबतच आता WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून कामं करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंत्रालयातील कामकाज आतापर्यंत ई मेल व्यतिरिक्त WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून होत होते. मात्र त्याद्वारे होणाऱ्या माहितीचे आदान-प्रदान अधिकृत मानले जात नव्हतं. मात्र कोरोना व्हायरसमुळे बदलती परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारच्या कामकाजास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार असून कामकाजालाही वेग येण्याची शक्यता आहे. तसेच अधिकारी घर बसल्या प्रस्ताव तयार करून ते वरिष्ठांना मान्यतेसाठी WhatsApp आणि SMS च्या माध्यमातूनही पाठवू शकतात. शासकीय ई मेलद्वारे प्रस्ताव पाठवल्यावर त्याची माहिती संबंधितांना WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून कळवावी, असे देखील सांगण्यात आले आहे.