Publish Date: Mon, 03 Feb 2020 (16:32 IST)
Updated Date: Mon, 03 Feb 2020 (16:37 IST)
पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी 9 फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे दोन मार्ग सुचवले होते. त्यातील एका मार्गाला पोलिसांनी परवानगी दिली असून, मोर्चाचा मार्ग ठरला आहे.
मोर्चा काढण्यातसंदर्भात मनसेनं मुंबई पोलिसांना पत्र दिलं होतं. यात राणी बाग ते आझाद मैदान व गिरगाव चौपटी ते आझाद मैदान हे दोन मार्ग सूचवण्यात आले होते. “एका मार्गाला पोलिसांनी नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी मनसे नेत्यांना केली. त्याचबरोबर गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे,” अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.