Publish Date: Fri, 18 Jun 2021 (21:09 IST)
Updated Date: Fri, 18 Jun 2021 (21:11 IST)
ब्रेक दि चेन अंतर्गत राज्य सरकारने लावलेले कडक निर्बंध आता टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार मुंबई व उपनगरातील कोरोना संसर्गाचा दर ३.७९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष लोकलकडे लागलं आहे. दरम्यान, लोकलसंदर्भात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली आहे.
मुंबई लेव्हल २ मध्ये गेल्यावर लोकलचा विचार करु. सुरुवातीला महिलांना प्रवास करण्याची मुभा देऊ. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांसाठी सुरु करु. महिलांना परवानगी दिल्यानंतर काय परिणाम काय होतात हे लक्षात घेऊन त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकल सर्वांसाठी सुरु करु, अशी माहिती इकबालसिंह चहल यांनी दिली. मुंबईत जी स्थिती आहे, त्यानुसार मुंबई लेव्हल ३ मध्ये आहे. आम्ही लेव्हल २ मध्ये आणण्याचा विचार करु. पुढच्या शुक्रवारपर्यंत जर आणखी स्थिती सुधारली. संसर्ग दर ३.७९ टक्क्यांवरुन अडीच टक्क्यांवर आला आणि रुग्णसंख्या ५०० पर्यंत खाली आली तर आम्ही निश्चितपणे लेव्हल २ संदर्भात विचार करु, अशी माहिती चहल यांनी दिली.