Publish Date: Mon, 17 May 2021 (19:00 IST)
Updated Date: Mon, 17 May 2021 (19:03 IST)
मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. नवी मुंबई रात्रीपासून पाऊस पडत आहे. मात्र, सकाळी 8 वाजता जोर कमी झाला होता. त्यानंतर 9.15 वाजल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर पामबिच सानपाडा येथे विजेचा खांब अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे मुंबईतील मोनो रेल्वे ची वाहतूक आज दिवसभरासाठी बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, जोरदार वारे वाहतील, असा हवामान विभागाने पुन्हा इशारा दिला आहे. हे वारे ताशी 90-100 किमी प्रतितास वेगाच्या वाहतील. यावेळी जोरदार वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, पालघर, मुंबई, ठाणे व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत दुपारी ३.४४ वाजता भरतीची वेळ आहे. त्यामुळे या कालावधीत पावसाचा जोर असाच कायम राहिल तर यंत्रणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भरतीच्या कालावधीत सर्वात उंच लाट ही ३.९४ मीटर उंचीची असेल. तर ओहोटीची वेळ ९.४२ वाजता असणार आहे. ओहोटीच्या वेळेत लाटांची उंची २.१९ मीटर इतकी असेल.