Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

..तर कपिलचं शूटिंग बंद पाडू; मनसेचा इशारा

..तर कपिलचं शूटिंग बंद पाडू; मनसेचा इशारा
मुंबई , शनिवार, 10 सप्टेंबर 2016 (09:57 IST)
मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी लाच मागितल्याचा दावा करतानाच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप केल्याने ‘कॉमेडीकिंग’कपिल शर्माविरोधात मनसे आणि शिवसेनेने दंड थोपटले आहेत. लाचखोरीच्या आरोपाचे आणि त्यात मनसेने मध्यस्थी केल्याचे पुरावे द्या, नाहीतर मुंबईत शूटिंग करू दिले जाणार नाही, असा ‘खळ्ळ-खटॅक’ स्टाइल इशारा मनसेने दिला आहे.
 
इतकेच नव्हे तर, कपिल शर्माच्या कार्यालयाचे बांधकामच बेकायदेशीर असल्याचे समोर आल्याने आता कपिल शर्माला अटक कधी करणार, असा सवालही मनसेने मुख्यमंत्र्यांना केला आहे.
 
कपिल शर्मा यानं टिटरवरून केलेल्या लाचखोरीच्या आरोपाचे तीव्र पडसाद दिवसभर मुंबईत उमटले. ऑफिससाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी महापालिका अधिकार्‍याने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा त्याने केला होता. विशेष म्हणजे, या टिटमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टॅग करून, ‘हेच का तुमचे अच्छे दिन?’ असेही त्याने खोचकपणे विचारले होते. त्यामुळे हे टिट वेगाने व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आले. या संदर्भात, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिलने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांवरही लाचखोरीचा ठपका ठेवला. त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा आरोप त्याने केला. त्यावरून सेना-मनसेचे नेते खवळले आहेत.
 
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्माचा समाचार घेतला. कपिल शर्मा यांनी योग्य पुरावे न दिल्यास त्यांना मुंबईत शूटिंग करू दिले जाणार नाही, असे खोपकर यांनी ठणकावले. कपिल शर्मा यांच्या ऑफिसचे बांधकाम जिथे करण्यात आले, तिथे खारफुटीचे जंगल होते. ते तोडून बांधकाम करणे हाही गुन्हाच आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी कपिल शर्माच्या अटकेचीच मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फौजदारी कारवाईचीच मागणी केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमान गढी मंदिरात घेतले दर्शन