Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
, शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (10:11 IST)
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
 
दोन दिवसांपूर्वी कोर्टानं या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस गुरुवारी रात्री ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता त्या ठिकाणी घेऊन गेले होते.
 
"नेमकी काय आणि कशी घटना घडली याची माहिती घेत असताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला, त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमध्ये चारही जण मारले गेले," असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
 
हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे.
 
28 नोव्हेंबर रोजी पशूवैद्यक म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय तरूणीला हैदराबादमध्ये कथितरित्या बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं होतं.
 
"हैदराबादच्या पोलिसांनी योग्यच केलं आहे, मी त्याचे आभार मानते. मी गेल्या 7 वर्षांपासून कोर्टात चकरा मारत आहे. सर्वांनी हे पाहिलं पाहिजे की हैदराबाद पोलिसांनी कसं केलं आहे. निर्भयाच्या दोषींना लवकर फाशी मिळावी यासाठी मला अजून संघर्ष कराला लागत आहे. हैदराबादच्या मुलीला आज न्याय मिळाला आहे," अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
 
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून शिकावं असं म्हटलंय. उन्नाव बलात्कार प्रकरणाबाबत बोलाताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
ज्यष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी मात्र अशा प्रकारच्या घटनांना लोकशाहीत जागा नसल्याचं म्हटलंय.
 
"न्यायालयीन प्रक्रियेशिवाय अशा प्रकारच्या एन्काउंटरला लोकशाहीत जाता नाही, कायद्याद्वारे दोषींना शिक्षा व्हायला पाहिजे होती," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
 
अशी घडली होती घटना
मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
 
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
 
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.
 
मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
 
त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.
 
त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिपाई नाही तर पाणी नाही