Publish Date: Fri, 29 Jan 2021 (07:33 IST)
Updated Date: Fri, 29 Jan 2021 (07:35 IST)
देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे.
अण्णा हजारे म्हणाले, “गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी पाच वेळा पत्र लिहिलं. सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता मी ३० जानेवारी २०२१ रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की केवळ मी राळेगणसिद्धी येथून उपोषण करेन तर जे मला समर्थन देऊ इच्छितात त्यांनी आपल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही” असं सांगितल.