Publish Date: Wed, 04 Nov 2020 (16:42 IST)
Updated Date: Wed, 04 Nov 2020 (16:45 IST)
रिपब्लिकन टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
एका मोठ्या टीव्ही चॅनलच्या संपादकाला तुम्ही फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधं देऊ द्या, मग निघूया. पण ते एकलं जात नाही. या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
“अर्णव यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार कुठलीतरी संधी शोधत होतं. त्यातूनच ही कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असूद्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.