Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकलं, रात्री दहापर्यंत सुरू राहील 'लँडफॉल'

Cyclone Biparjoy
, गुरूवार, 15 जून 2023 (19:35 IST)
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय हे चक्रीवादळ आज (15 जून) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरात किनाऱ्याला धडकलं.
 
या प्रक्रियेला लँडफॉल असं संबोधलं जातं. जाखौ बंदराजवळ हे लँडफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रात्री दहापर्यंत ते सुरू राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाकिस्तानातील कराची किनारपट्टीजवळही त्याचा मोठा प्रभाव दिसून येईल.
 
हे वादळ 120-130 ते 145 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
 
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिशय तीव्र स्वरुपाचे असलेले चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून ईशान्येकडे जात असून त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
 
सध्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील वातावरण वेगाने बदलत आहे. द्वारका, जामनगर, मोरबी आणि राजकोट परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस आणि वेगवान वारे वाहत असल्याच्या बातम्या आहेत.
 
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या माहितीनुसार, अनेक गावांमध्ये वीजेचे खांब कोसळून पडल्याची बातमी आहे.
 
मुंबईत उंचच उंच लाटा
गुजरातसह मुंबईतील परिस्थितीही बिकट होत आहे. किनारी भागातील चौपाट्यांवर जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे.
 
महाराष्ट्राच्या किनारी भागावरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात याचा प्रभाव दिसून येत आहे. येथील तटबंदीवर जोरदार लाटा आदळत आहेत.
 
सध्या चौपाटीवर न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
 
हे वादळ नेमका कसा प्रवास करत आहे हे लाइव्ह पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
 
चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीला धडकण्यापूर्वी तिथली परिस्थिती काय आहे, हे जाणून घ्या या लाइव्ह रिपोर्टमधून- LIVE
 
हवामान विभागाने काय म्हटलं?
गुरूवारी (15 जून) सकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय कच्छमधील जाखौ बंदरापासून 180 किलोमीटर अंतरावर होतं, तर देवभूमी द्वारका आणि नलियापासून 210 किलोमीटर अंतरावर होतं.
 
हे वादळ ईशान्य दिशेने सरकत असून ते गुरूवार संध्याकाळपर्यंत अतितीव्र होईल.
 
वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना धोक्याची सूचना दिलेली आहे.
 
यामध्ये किनारी भागातील केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातसह राजस्थानलाही अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
 
हवमान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "बिपरजोय आता ईशान्य दिशेने पुढे जात आहे. संध्याकाळपर्यंत ते कच्छ आणि पाकिस्तानला धडकेल. या वादळाचा सर्वाधित प्रभाव कच्छवर होईल."
 
सोबतच कच्छ खाडीशी लागून असलेल्या जिल्ह्यांवरही याचा प्रभाव दिसून येईल. डॉ. महापात्रा यांच्या माहितीनुसार, वादळाचं लँडफॉल सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत सुरू राहील. मांडवी आणि कराची यांच्या मधील जाखौ बंदरानजिक हे जमिनीला धडकेल."
 
प्रशासनाची तयारी
“कच्छ जिल्ह्यातल्या 47 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यांना पर्यायी निवारा केंद्रांमध्ये नेण्यात आलं आहे. गरोदर महिलांची सोय रुग्णालयं आणि अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. शून्य हानी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी ते जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावं, प्रवास करू नये,” असं गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषीकेश पटेल यांनी म्हटलं आहे.
 
या वादळाचा सर्वांत जास्त प्रभाव गुजरातमध्ये जाणवणार असला, तरी मुंबईतही त्याचा परिणाम दिसेल. मुंबईत उंच लाटा पाहायला मिळतील. खबरदारीचा उपाय म्हणून जुहू बीचवर लाइफ गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील चौपाट्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
 
गुरूवारी (15 जून) सकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय कच्छमधील जाखौ बंदरापासून 180 किलोमीटर अंतरावर होतं, तर देवभूमी द्वारका आणि नलियापासून 210 किलोमीटर अंतरावर होतं.
 
हे वादळ ईशान्य दिशेने सरकत असून ते गुरूवार संध्याकाळपर्यंत अतितीव्र होईल.
 
“कच्छ जिल्ह्यातल्या 47 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून त्यांना पर्यायी निवारा केंद्रांमध्ये नेण्यात आलं आहे. गरोदर महिलांची सोय रुग्णालयं आणि अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. शून्य हानी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी ते जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावं, प्रवास करू नये,” असं गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषीकेश पटेल यांनी म्हटलं आहे.
 
या वादळाचा सर्वांत जास्त प्रभाव गुजरातमध्ये जाणवणार असला, तरी मुंबईतही त्याचा परिणाम दिसेल. मुंबईत उंच लाटा पाहायला मिळतील. खबरदारीचा उपाय म्हणून जुहू बीचवर लाइफ गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील चौपाट्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी (14 जून) बिपरजॉय संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली.
 
त्यांनी म्हटलं, “चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात कोणताही बदल झालेला नाही. चक्रीवादळ त्याच मार्गाने पुढे सरकत आहे आणि 15 जूनला कच्छमधील जाखौ बंदराजवळ संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत धडकण्याची शक्यता आहे.”
 
हवामान विभागाच्या अहमदाबाद विभागाचे संचालक मनोरमा मोहंती यांनीही वादळाच्या परिणामांची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, "वादळानंतर कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात."
 
मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटलं, "गुजरातच्या किनारी भागात वेगाने वारे वाहतील, परंतु कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक वारे वाहतील."
 
सरकारने काय तयारी केली आहे?
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, केंद्रीय गृह मंत्रालय 24 तास परिस्थितीचा आढावा घेत आहे.
केंद्र सरकार या प्रकरणी राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे.
NDRF ने वादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागांमध्ये 12 टीम तैनात केल्या आहेत.
मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.
विमानं आणि हेलिकॉप्टर किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.
लष्कर, एअर फोर्स आणि इंजिनिअर टास्क फोर्स युनिट्स बोटी आणि बचाव उपकरणांसह स्टँड बायवर आहेत.
लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथकेही मदतीसाठी सज्ज आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, गुजरातमध्ये मुख्यमंत्री स्तरावर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन सज्ज आहे.
यासोबतच कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये, एजन्सी यांच्या सतत संपर्कात आहेत.
या वादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बिपरजॉय चक्रीवादळ इतका काळ कसं टिकलं?
6 जून 2023. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. पुढच्या काही तासांतच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली.
 
7 जून 2023 चा दिवस संपण्यापूर्वी आधी सीव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हियर सायक्लोन म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली.
 
अवघ्या चोवीस तासांत ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं, ते अगदी थक्क करणारं आहे. इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली.
 
६ जूनला हे चक्रीवादळ तयार झालं होतं आणि 15 जूनला ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. म्हणजे जवळपास दहा दिवस या वादळाची ताकद टिकून राहिली, असं म्हणता येईल.
 
पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अर्थात आयआयटीएमच्या 2021 सालच्या अहवालानुसार उत्तर हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांचा कालावधी गेल्या चाळीस वर्षांत 80 टक्के वाढला आहे. तसंच अतीतीव्र चक्रीवादळांचा कालावाधी 260 टक्क्यांनी वाढला असल्याचंही हा अहवाल सांगतो.
 
समुद्राच्या एखाद्या भागात तापमान वाढलं की तिथली हवा वर सरकते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यातूनच चक्रीवादळाची निर्मिती होते.
 
म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जेवढं जास्त तेवढी वादळाला मिळणारी ऊर्जा जास्त असते आणि त्यातूनच वादळ ताकदवान बनतं, जास्त दिवस टिकून राहतं आणि जास्त अंतर पार करू शकतं.
 
याउलट चक्रीवादळ जमिनीला धडकतं किंवा थंड पाण्याच्या प्रदेशात सरकतं, तेव्हा त्याला मिळणारी ऊर्जा कमी होते आणि ते विरून जातं.
 
गेल्या काही दशकांत अरबी समुद्राचं तापमान सातत्यानं वाढत असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या 2019 सालच्या अहवालात म्हटलं होतं. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो. जागतिक तापमानवाढीमुळे हे होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
म्हणजेच आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाशी बिपरजॉय सारख्या चक्रीवादळांच्या तीव्रतेचा थेट संबंध आहे.
Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Edible Oil Price: खाद्यतेल स्वस्त होणार, रिफाइंड, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर सरकारने घेतला मोठा निर्णय