Publish Date: Mon, 03 Sep 2018 (09:13 IST)
Updated Date: Mon, 03 Sep 2018 (09:15 IST)
लोकपाल बिल, प्रत्येक राज्यात लोकायुक्त नियुक्ती, डॉ. स्वामिनाथन आयोग अंमलबजावणी याबाबत पाच वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पाळले नाही. म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2 ऑक्टोबर पासून राळेगण सिध्दी येथे उपोषण करणार असल्याचे घोषीत केले आहे. भाजपा सरकार सत्तेवर येऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. परंतु, अजूनही लोकपाल कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे या सरकारमध्ये कृतघ्नता आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे असा घणाघती त्यांनी केला आहे.
अण्णांनी पत्रक जाहीर केरून ही माहिती दिली आहे. पत्रकात अण्णा म्हणाले की, लोकपाल, लोकायुक्त कायदा बिल संसदेमध्ये 1966 ते 2011 या काळात वेगवेगळ्या पक्षांनी आठ वेळा आणले. परंतु, बिल पारित होऊ शकले नाही. कारण पक्षांना लोकपाल, लोकायुक्त नको आहे. 2011 मध्ये देशातील जनता रस्त्यावर उतरली होती. तेव्हा जनतेच्या दबावामुळे तत्कालीन सरकारला लोकपाल, लोकायुक्त कायदा करणे भाग पडले होते. राष्ट्रपतींनी 1 मे 2014 रोजी कायद्यावर स्वाक्षरी केली. यानंतर लोकपाल, लोकायुक्तची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु सरकारने वेगवेगळे कारणे सांगून लोकपाल, लोकायुक्तची नियुक्ती टाळली. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनेकवेळा आदेश काढले. तरीही, सरकारने लोकपाल नियुक्ती केली नाही. यामुळे मी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अण्णांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.