Publish Date: Fri, 12 Jun 2020 (08:35 IST)
Updated Date: Fri, 12 Jun 2020 (08:38 IST)
कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारताच्या पहिल्या मानवरहित “मिशन गगनयान“ मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या“मिशन गगनयान“ मोहिमेवर काम करीत असून या मोहिमेची तयारी सध्या सुरू आहे. आता लॉकडाऊनमुळे या मोहिमेला उशिर होण्याची शक्यता असल्याचे `इस्रो’च्या अधिकार्यांनी सांगितले.
“चांद्रयान मोहीम“ शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) “मिशन गगनयान“ या मोहिमेवर काम सुरू केले आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाऊन घोषित झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात `पीटीआय’ वृत्तसंस्थेने “इस्रो“च्या अधिकार्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
“कोरोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसे सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आणखी अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. “मिशन गगनयान“ मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणार्या पथकाने अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत,” असे “इस्रो“च्या अधिकार्याने `पीटीआय’ला सांगितले.
“इस्रो“ने सध्या “मिशन गगनयान“ मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेंतर्गत प्रारंभी मानवरहित दोन फ्लाईट्स पाठविण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. यातील पहिले फ्लाईट डिसेंबर 2020 मध्ये, तर दुसरे फ्लाईट जुलै 2021 मध्ये पाठविण्यात येणार आहे.