Publish Date: Fri, 17 Jul 2020 (09:19 IST)
Updated Date: Fri, 17 Jul 2020 (09:22 IST)
भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी चार वाजताची वेळ देण्यात आली आहे. दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी सुद्धा पाकिस्तानने मान्य केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते. कुठल्याही अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.
कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काऊंन्सलर अॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे.
मागच्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.