Publish Date: Sat, 04 Jan 2020 (10:58 IST)
Updated Date: Sat, 04 Jan 2020 (10:59 IST)
तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत? असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथं नागरिकत्व कायद्याविरोधातल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी भाषण केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, "स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागणं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे."
"दीर्घ परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा भारत देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार पाकिस्तानशी का तुलना करतात? तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत?" असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.
वारंवार पाकिस्तानचा संदर्भ का देता, असं विचारत त्या पुढे म्हणाल्या, "तुम्ही हिंदूस्तानबद्दल का बोलत नाही? आम्हाला पाकिस्तान नकोय. आमचं हिंदूस्तानावर प्रेम आहे."
ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष वारंवार पाकिस्तानचा मुद्दा काढत असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.