Publish Date: Mon, 03 Apr 2017 (11:15 IST)
Updated Date: Mon, 03 Apr 2017 (11:17 IST)
काश्मीरच्या युवकांना पर्यटन हवे की दहशतवाद असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे उपस्थित केला. काश्मीरमध्ये काही तरुण दगडफेक करत आहेत तर काही तरुण दगडांना फोडून बोगदे निर्माण करण्याचे काम करत आहे. तुम्हाला नवनिर्माण करायचा आहे की अशांतता निर्माण करायची आहे याचा निर्णय तुम्हीच घ्यावा, असे पंतप्रधान यांनी म्हटले. मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी काश्मीरच्या युवकांना साद घातली.
गेल्या चाळीस वर्षांमध्ये काश्मीरमध्ये केवळ हिंसाचारच झाला. जर हिंसाचाराऐवजी या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाबद्दल बोलले गेले असते तर सर्व जग आज काश्मीरच्या पायाशी लोळताना दिसले असते, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
जम्मू काश्मीरमधील नशरी ते चेनानी असा हा बोगदा तयार करण्यात आला असून या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी झाले आहे. द्रुतगती मार्गावरील या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. चार वर्षांच्या विक्रमी वेळेत देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.