Publish Date: Mon, 09 Apr 2018 (16:34 IST)
Updated Date: Mon, 09 Apr 2018 (16:37 IST)
देशभरात काँग्रेसने आज उपोषण आणि आंदोलन पुकारले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी अर्थात राजघाटावर उपोषणासाठी पोहोचले आहेत. मात्र, उपोषणाची वेळ उलटून गेल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर त्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, भाजपाकडून राहुल गांधीच्या या उशीरा येण्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली आहे.
राजघाटावर उपोषण होणार असल्याने दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी सकाळपासून येथे हजेरी लावली. मात्र, राहुल गांधी वेळेत पोहोचले नाहीत. उपोषणासाठी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी १ वाजता उपोषणस्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधींना अभिवादन करुन उपोषणाला बसले आहेत.