Publish Date: Sat, 12 May 2018 (14:48 IST)
Updated Date: Sat, 12 May 2018 (14:57 IST)
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये विमानांप्रमाणेच ब्लॅक बॉक्स बसविले जाणार आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचं अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आलं आहे. रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या प्रकारची सुविधा ही विमानामध्ये असते, नेमके अपघात होतांना काय घडते त्याची माहिती यामध्ये संग्रहित होते. त्यामुळे अनेक अपघात रोखता येणार आहेत.
'ब्लॅक बॉक्स असलेले स्मार्ट कोचेस रेल्वे वाहतूक क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणार आहेत. या नवीन सुरक्षा सुविधेमुळे रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित आणि सुखकर होणार असे रायबरेली कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितल आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ब्लॅक बॉक्स असलेल्या स्मार्ट कोचेसचं अनावरण करण्यात आले आहे. या नवीन प्रणालीने ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अंतर्गत वायर्सचं तापमान मोजलं जाणार आहे. सोबतच केबलची स्थितीदेखील तपासली जाणार असून, त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे होणारं नुकसान टाळता येणार आहे. ब्लॅक बॉक्समुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असून, सोबतच त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही वाढ होईल, रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील, असं मुख्य अभिनेते इंद्रजित सिंग यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता भारतीय रेल्वे आधुनिक होतेय याचा नक्की प्रवासी वर्गाला होणार आहे.