Publish Date: Tue, 12 Jun 2018 (11:13 IST)
Updated Date: Tue, 12 Jun 2018 (11:15 IST)
भाजपच्या दोन-तीन नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळ्या देशाला गुलाम बनवले असल्याची घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी परिषदेला संबोधित करताना राहुल यांनी भाजप व संघावर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपचे दोन-तीन नेते आणि संघ पडद्याआडून सरकार चालवत आहेत. लोकसभेत, विधानसभेतील विरोधी पक्षांचे ऐकले जात नाही. फक्त संघाचेच ऐकले जाते. संघ ओबीसींमध्ये फूटपाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. देशात आज कोणीही खुलेपणाने बोलत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येकजण आपले म्हणणे उघडपणे मांडू शकत होते. आता मात्र, तशी स्थिती राहिली नसल्याचे राहुल यांनी म्हटले.
राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील मोदी सरकार फक्त 15 सर्वात श्रीमंत लोकांसाठी काम करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, त्यांची कर्जे माफ केली जात नाहीत. देशातील श्रीमंत व्यक्तींची कर्जे माफ केली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतरांनी केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय घेत असल्याची अप्रत्यक्ष टीका राहुल यांनी केली.