Publish Date: Wed, 15 Sep 2021 (22:16 IST)
Updated Date: Wed, 15 Sep 2021 (22:18 IST)
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांची मालिक सुरु केली आहे. या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मानहानीचा दावा करणारी नोटीस किरीट सोमय्या यांना वकिलामार्फत पाठवली आहे. ७२ तासाच्या आत माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा दावा केला जाईल, असं या नोटीशीत सांगण्यात आलं आहे. मात्र यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आपली लढाई सुरुच राहील असं ट्विटरवरून सांगितलं आहे.
“अर्धा डझन मानहानीच्या आणि इशाऱ्याच्या नोटीसा मला ठाकरे सरकारमधील प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, हसन मुश्रीफ, अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मिळाल्या आहेत. त्यांनी माझ्या बायको आणि मुलाचीही चौकशी केली.”, असं सांगत “चोर मचाये शोर” असं ट्वीट केलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरुच राहील असं स्पष्ट केलं आहे.
“असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना मी घाबरत नाही. ठाकरे सरकार अलिबाबा चाळीस चोरांचं सरकार आहे. या घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आतापर्यंत २६ घोटाळे उघडकीस आले आहेत. काहींमध्ये अधिकारी तर काहींमध्ये नेते आहेत. मी ११ जणांची यादी तयार केली होती आणि आता त्यामध्ये तिघांचा समावेश झाला आहे. आता माझे सहकारी आणखी तीन घोटाळ्यांवर काम करत आहेत,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.