Publish Date: Thu, 20 Aug 2015 (10:12 IST)
Updated Date: Thu, 20 Aug 2015 (10:15 IST)
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रायोगिक तत्त्वावर युती करणार असल्याची उपहासात्मक टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
काही लोकांना केवळ मोदी यांच्यावर टीका करून राजकारण केल्यासारखे वाटते. हे प्रदीर्घ काळापासून सुरू असून प्रत्येकवेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते. आता प्रयोग करण्यात येत आहेत. दिल्ली आणि बिहारचे मुख्यमंत्री एकत्रपणे मोदींवर एका सुरात टीका करत आहेत. पण त्यांचे गीत बेसूर झाले आहे. जेव्हा हे दोन्ही मुख्यमंत्री जमिनीवर येतील त्यावेळी त्यांना वास्तव समजेल, अशा शब्दांत भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एका मंचावर एकत्र आले होते. दिल्लीस्थित बिहारमधील मतदारांना जोडण्यासाठी दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या बिहार सन्मान संमेलन कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नितीशकुमार बुधवारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर नक्वी बोलत होते.