Publish Date: Tue, 12 Jan 2016 (14:58 IST)
Updated Date: Tue, 12 Jan 2016 (15:02 IST)
काही ‘तुफानी’ करताना सेल्फी काढण्याच्या नादात जिवावर बेतल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याबाबत स्वत:च स्वत:वर संयम ठेवून मनाला ब्रेक लावणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय..
गाडी चालवताना सेल्फी क्लिक करणं, ट्रेनसमोर, ट्रेनच्या टपावर सेल्फी काढायला जाणं, उंचावर असताना सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणं, समुद्रकिनारी-धोकादायक जागी सेल्फी क्लिक करणं या वेडापायी अनेकजण बिनधास्त जीव धोक्यात टाकू लागलेत. बँडस्टँडलाही नुकतीच अशी घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकणार्यांबद्दल काय करता येईल यावर जगभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा आणि संशोधन सुरू आहे. काहीतरी ‘तुफानी’ करण्याच्या नादात हे घडत असल्यानं, मुळात स्वत:वर संयम ठेवणं आवश्यक झाल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.
सेल्फीचं अतिवेड हे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही घातक ठरू लागल्याचं दिसून येतंय. सेल्फी कधी, कुठे कसा काढावा याचं भान आपल्याला आहे का हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची आणि स्वत:वर संयम ठेवण्याची सवय लावून घेणं गरजेचं झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने त्यांच्या वेबसाइटवर सेल्फी हा मानसिक आजार असल्याचं सांगत त्याला ‘सेल्फीटीज’ हे नाव दिलं असून, त्याचे तीन प्रकार सांगितले आहेत.