Publish Date: Thu, 28 Jul 2022 (08:29 IST)
Updated Date: Thu, 28 Jul 2022 (08:30 IST)
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगर शहराचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करावे, अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून पडळकर यांनी ही मागणी केली. अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मरण राहील,असे मत या पत्राद्वारे पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
"अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे, परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर, अहिल्यादेवी हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वतंत्र इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे," असं पडळकर यावेळी म्हणाले.