राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भविष्यात भाजप सोबत सत्तेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचा प्रकाश आंबेडकरांनी दावा केला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केले. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी न राहता गाववाले विरुद्ध बाहेरचे अशीच होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
1972 च्या दुष्काळानंतर अनेक कुटुंबे पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित झाली आणि त्यांनी येथे आपले जीवन उभे केले. मात्र एवढी वर्षे राहूनही त्यांना आजही स्थानिक म्हणून स्वीकारले जात नसल्याचे ते म्हणाले. ही निवडणूक स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाणार असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टोला लगावला आहे. ते म्हणाले अजित पवार पिंपरी चिंचवडचे नसून बारामतीचे आहे. हे लक्षात ठेवावे.
महाविकास आघाडी सोडून शरद पवार सत्ताधारी गटात सहभागी होतील का, या थेट प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी होकारार्थी उत्तर देत राजकीय चर्चांना वाढवले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. काँग्रेसमधील अनेक स्थानिक नेते केवळ नावापुरते काँग्रेसमध्ये असून, त्यांच्या राजकीय विचारांची दिशा भाजपकडे असल्याचा आरोप त्यांनी केला.