Publish Date: Tue, 06 Oct 2020 (17:17 IST)
Updated Date: Tue, 06 Oct 2020 (17:18 IST)
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून जोपर्यंत करोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ येथे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणार्या विद्यार्थीची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर आता लवकरच राज्यातील ग्रंथालय देखील सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.