अकोल्यात रस्ता ओलांडणार्या पाच महिलांसह एक चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले. त्यात सर्व महिला आणि चिमुरड्याचा मृत्यु झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. पाचही महिला शेत मजूर होत्या. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला आणि ट्रक चालकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोलापासून 25 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी गावात पाच महिला मजूर सकाळी साडे नऊच्या शेतीवर काम कऱण्यासाठी निघाल्या होत्या. महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करुन त्याला थांबवले. संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला पेटवून दिले तसेच ट्रकचालकाला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. याघटनेमुळे कोळंबी गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सध्या बंद केली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.