शिवसेनेचे 25 आमदार नाराज?
Publish Date: Tue, 08 Mar 2022 (13:57 IST)
Updated Date: Fri, 30 Sep 2022 (21:55 IST)
शिवसेनेचे जवळपास 25 आमदार निधीवाटपाबाबत आवाज उठवणार
सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांनी निधीवाटपात होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. आम्हाला जर निधी मिळाला नाही, तर अर्थसंकल्प मांडत असताना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात एकच खळबळ उडालीय. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर करण्यात येणार असून, त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक असतं.
अर्थ विभाग, ग्रामविकास विभाग आणि जलसंपदा या राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना भरमसाट निधी मिळतोय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना चांगला निधी देत आहेत, पण आम्हाला निधी मिळत असल्याचं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघांसाठी 900 कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी 700 कोटी रुपये, तर शिवसेनेच्या आमदारांसाठी फक्त 300 कोटी रुपये देण्याचे ठरवण्यात आलेय. अशाच प्रकारे जर निधी वाटप होणार असल्यास अर्थसंकल्पावेळी विधानसभेत बसणार नसल्याचं शिवसेनेच्या आमदारांनी सांगितलंय. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, आमदार आशिष जयस्वाल, भरत गोगावले, वैभव नाईक या चार आमदारांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केलीय.
पुढील लेख