Publish Date: Wed, 21 Aug 2019 (10:01 IST)
Updated Date: Wed, 21 Aug 2019 (10:05 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप-शिवसेना नेत्यांवर जहरी टीका केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेनंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे. आदित्य हे पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत सगळीकडे पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे.
धनंजय मुंडे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत बोलत होते. शिवसेनेची राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. भाजपची महाजनादेश यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेत सरकारने केलेली कामं सांगतात. पण ही कामं फक्त त्यांच्या पुण्यवान कार्यकर्त्यांनाच दिसतात, सामान्य जनतेला दिसत नाहीत, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. निवडणुका ज्या प्रकारे जवळ येत आहेत त्या प्रकारे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. तर या विधानसभा निवडणुकीच्या आगोदर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.