Publish Date: Thu, 10 Mar 2022 (15:25 IST)
Updated Date: Thu, 10 Mar 2022 (15:27 IST)
कोरोनामुळे अनेक बालके अनाथ झाली. नाशिक जिल्हा प्रशासनाने या अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारत त्यांना मायेचा आधार दिला. याबददल नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे शासनाकडून गौरव करण्यात आला. या उपक्रमाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकार्यांचे विशेष कोतुक केले. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यांनीही ५० बालकांची शिक्षणाची जबाबदारी स्विकारली असून त्यांचा हा उपक्रम आदर्शवत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
या ट्विटमध्ये सुळे यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या जुळ्या मुलींना दत्तक घेतले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांच्या सहकारी अधिकार्यांनीही कोरोनामुळे अनाथ झालेल्या ५० बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना सूरज मांढरे व त्यांच्या सहकार्यांनी आपल्या कृतीतून आदर्श प्रस्थापित केला आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. असे ट्विट खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केले आहे. कोरोना महामारीचा अनपेक्षित धक्का प्रत्येकाला खूप काही शिकवून गेला. अनेकांना तर कायमचा पोरकं करून गेला. कधीही भरुन न येणारी ही पोरकेपणाची उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील महसूल आधिकार्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी दर्जाच्या आधिकार्यांनी एक व दोन पालक गमावलेल्या ५६ बालकांना दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी दोन जुळ्या मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यात, शासकीय योजनांव्यतिरिक्त संबंधित मूलांच्या अडी-अडचणींवर हे आधिकारी संबधित मूल सज्ञान होईपर्यंत कायम लक्ष ठेवून शाश्वत स्वरुपाची मदत करणार आहेत. इतर ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावे, असा हा उपक्रम आहे.