Publish Date: Fri, 16 Jan 2026 (21:48 IST)
Updated Date: Fri, 16 Jan 2026 (21:49 IST)
१६ जानेवारी म्हणजेच आज झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) अपेक्षित यश न मिळाल्याने आणि भाजपची सरशी झाल्याने त्यांनी "जनतेचा कौल मान्य" असल्याचे म्हटले आहे.
"जनतेचा कौल मान्य"
अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, लोकशाहीत मतदारांचा निर्णय सर्वोच्च असतो. पुणे आणि राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांनी जो निकाल दिला आहे, त्याचा आम्ही आदर करतो.
पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. "रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उमेदवारांचे मी आभार मानतो. विजय-पराजय हा खेळाचा भाग आहे, पण आपण लोकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू," असे त्यांनी नमूद केले. पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात बसलेल्या फटक्यानंतर त्यांनी मान्य केले की, पक्षाला आता 'आत्मचिंतन' करण्याची गरज आहे. कुठे चुका झाल्या आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात आपण कुठे कमी पडलो, याचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सुचित केले. "पराभवाने खचून न जाता, आम्ही पुन्हा जोमाने उभे राहू आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करू," असा विश्वास त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत पुण्यात भाजपने मोठा विजय मिळवला असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या संयुक्त प्रयत्नांना मतदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र निकालांवरून स्पष्ट होत आहे. विशेषतः पुण्यात भाजपने ८० पेक्षा जास्त जागांवर आघाडी/विजय मिळवल्याने हा अजित पवारांसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Edited By- Dhanashri Naik