Publish Date: Mon, 22 Feb 2021 (16:20 IST)
Updated Date: Mon, 22 Feb 2021 (16:22 IST)
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “राज्यात को\रोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे,” असं अजित पवार म्हणाले.
“आताच कोरोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना करोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.