Publish Date: Fri, 27 Aug 2021 (23:15 IST)
Updated Date: Fri, 27 Aug 2021 (23:16 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात करण्यात आलेल्या कारवाईर अनेक राजकीय मंत्री प्रतिक्रिया देत आहेत. मात्र जर प्रत्येकाने आपलं भान ठेवून वक्तव्ये केली असती तर ही वेळ आली नसती असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १ सप्टेंबर रोजी भेटीचा वेळ दिला असून महाविकास आघाडीतील प्रमुख मंत्री राज्यापालांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. अशा प्रकारच्या ज्यावेळेस गोष्टी येतात तेव्हा सामंजस्य भूमिका, सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवार यांना नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी म्हटलं आहे की, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता या चौघांना मंत्री केल्यानंतर यांना केंद्रातून राज्यात फिरण्याचा आदेश दिला आहे. मंत्रिपद आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे राज्यात फिरणं भागच आहे. या फिरण्यावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत आहेत त्या पाहिल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपलं भान ठेवून वक्तव्ये केली असती तर ही वेळ आली नसती. शपथ घेतल्यानंतर.. इतरांनीही मागे काही वक्तव्ये केली होती मात्र त्यांनी त्यावेळेस शपथ घेतली नव्हती. ज्यावेळी राज्यापालांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली जाते त्यावेळी आपण एक जबाबदार शासन म्हणून काम करण्यास सुरुवात करतो. तेव्हा सगळ्यांचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. न्याय द्यावा लागतो असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.