Publish Date: Tue, 02 Jul 2019 (09:55 IST)
Updated Date: Tue, 02 Jul 2019 (09:58 IST)
मराठवाड्यासाठी दुष्काळ ही सर्वात मोठी समस्या उभी राहिली आहे. दिवसेंदिवस ही समस्या तीव्रच होत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मराठवाड्यातील सर्व आमदार, मंत्री एकत्र आले आहेत. वॉटरग्रीड प्रकल्प मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे. तरी सुद्धा प्रकल्पातून माणसांची तहान भागवण्या बरोबरच मातीचीही तहान भागवणं आवश्यक आहे. फक्वत वरच्या धरणांनी पाणी अडविणे सुरूच ठेवलं तर आम्ही किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी लढायचं ? असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी बैठकीत उपस्थित केला आहे. प्रकल्प मराठवाड्यासाठी सर्व दृष्टीने सोयीचा व्हावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रितपणे भेट घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय आमदारांनी घेतला आहे. मराठवाड्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या वॉटरग्रीड प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक विधानभवनातील अध्यक्षांच्या समिती कक्षात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, अर्जुन खोतकर, अतुल सावे, प्रधान सचिव शामलाल गोयल यांच्यासह मराठवाड्यातील सर्व आमदार उपस्थित होते.