Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये जनता कर्फ्यूचे आवाहन

नाशिकमध्ये जनता कर्फ्यूचे आवाहन
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (07:35 IST)
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. तर देशात या रोगामुळे नाशिकचे नाव दुर्दैवाने 1 नंबरला आले आहे. याच गंभीर पार्श्वभूमीवर नाशिकमधील व्यापारी संघटनांनी उशिरा का होईना एकत्र येत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. दि. 19 एप्रिल पासून जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून दहा दिवस नाशिककर जनता कर्फ्यू पाळणार आहेत. शहरातील विविध संघटना यासाठी एकत्र आल्या असून जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नाशिककरांना आवाहन केले आहे.
 
याबाबत नाशिक सिटीझन फोरमने सर्वात पुढे येत जाहीर आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी नाशिकमधील करोना परिस्थिती सुधारण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना आणि मिडीयाला स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 
 
नाशिक सिटीझन फोरम जाहीर आवाहन
आपल्या नाशिकचे नाव विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे आजवर अनेकदा देशभरात वरच्या क्रमांकावर राहिल्याचा अभिमान आपण बाळगत आलो आहे. आजमितीस मात्र नाशिकचे नाव कोरोनाप्रसारामध्ये राज्य आणि देशभरात झळकल्यामुळे आपण सगळेच अस्वस्थ झालो आहोत. गेल्यावर्षी आपण नाशिकमध्ये कोरोनाला बराच काळ थोपवून धरण्यात यशस्वी ठरलो. यावेळी मात्र परिस्थिती विपरीत आहे. ती सुधारण्यासाठी नाशिकमधील विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना आणि मिडीयाला स्वयंस्फूर्तीने पुढे यावे लागेल.
 
कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स, औषधे, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर बेड यांचा सर्वत्र आहे तसाच तुटवडा नाशिकमध्येही निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन-पोलीस त्यांच्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेच. पण, त्याचवेळी त्यांना त्यांच्या नैमित्तिक प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहेत. शासन-प्रशासन-पोलीस आणि आरोग्य सेवा देणारे सर्वच जण तब्बल वर्षभरापासून कामाचा मोठा ताण सहन करत आहेत.
 
बाधितांना सेवा पुरविणे व मनुष्यहानी कमी करणे हे त्यांच्यापुढील सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. अशावेळी संसर्ग होण्यास अटकाव करण्याची जबाबदारीही त्यांच्याच माथी मारण्याऐवजी सर्वच राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार आणि औद्योगिक संघटनांनी तसेच मिडीयाने कोरोना संसर्गाला अटकाव करण्याचे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे.
त्यासाठी एक तातडीचा उपाय म्हणजे आपण सर्वांनीच पुढील दहा दिवस नाशिक शहरात जनता कर्फ्यू घडवून आणावा. हा अंतिम अथवा एकमात्र उपाय नाही, हे मान्य केले तरी सध्यस्थिती नियंत्रणात आणण्यास त्याची निश्चितच मदत होईल, अशी आशा वाटते.
 
नाशिक सिटीझन्स फोरमने जनता कर्फ्यूची संकल्पना मांडल्यानंतर तिला विविध स्तरांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मा. पालकमंत्री, मा. महापौर आणि प्रशासनाकडून फोरमच्या या भूमिकेचे स्वागत केले गेले. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरनेदेखिल यासंदर्भात एका ऑनलाईन बैठकीत विविध संघटनांच्या सुमारे साठ प्रतिनिधींची मते जाणून घेतली. त्यात क्रेडाई, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हार्डवेअर अँड पेंटस् मर्चंट असोसिएशन अशा अनेक संघटनांनी या भुमिकेला दुजोरा दिला आहे.
 
म्हणूनच आपणास जाहिर आवाहन आहे की,
सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ पासून आपण नाशिक शहरात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवेत असलेल्या भाजीपाला, फळे व दुध विक्रेत्यांनी देखिल केवळ सकाळी ७ ते १० आणि किराणा दुकानदारांनी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी विनंती करत आहोत!
 
चला, हा जनता कर्फ्यू यशस्वी करूया !
कोरोनाला अटकाव करण्याचे एक आदर्श उदाहरण जगापुढे ठेवूया !!
कोरोनाला हरवूया, नाशिकला वाचवूया !!!
आपला,
हेमंत राठी
अध्यक्ष, नाशिक सिटीझन फोरम
 
भाजीपाला, फळे व दुध विक्रेत्यांनी देखिल केवळ सकाळी ७ ते १०
 किराणा दुकानदारांनी सकाळी ८ ते दुपारी १
 
आता नाशिकचे महापौरच म्हणतात कडक लॉकडाऊन करा !
नाशिक : लॉकडाऊन नको अशी आतापर्यंत भूमिका मांडणारे महापौर सतीश कुलकर्णी हेच आता लॉकडाऊन झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे महापौरांनी ही मागणी केली आहे.महापौरांनी म्हटले की, शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती जवळपास हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या मर्यादित असल्याने उपचार करण्यास प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत प्रशासन व पदाधिकारी सातत्याने योग्यप्रकारे कामकाज करीत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अतिशय चिंताजनक! कोरोना संसर्गात नाशिक देशात पहिले; १० लाखांमागे सर्वाधिक बाधित