Publish Date: Fri, 15 May 2026 (14:22 IST)
Updated Date: Fri, 15 May 2026 (14:42 IST)
हिंदू धर्मात, प्रत्येक एकादशीच्या तारखेला विशेष महत्त्व आहे. तसेच एकादशीचा सण श्रद्धा, उपवास आणि अध्यात्माला समर्पित मानला जातो. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. ज्यांना मानसिक अशांती, अनावश्यक ताण आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती हवी आहे, त्यांच्यासाठी एकादशीचा हा उपवास विशेषतः फायदेशीर मानला जातो. हा उपवास केल्याने मन मजबूत होते आणि एकाग्रता वाढते. नेहमीप्रमाणे, २०२६ आषाढी एकादशी २५ जुलै रोजी येत आहे.
तसेच विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून आषाढी वारी २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदाची आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी आहे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि जगद्गुरु तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्यांचे प्रस्थान आणि पुढील प्रवासाचे नियोजित वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे.
वारकरी संप्रदायांसाठी पंढरीची वारी अतिशय महत्वाची मानली जाते. यावर्षी देखील भक्त ताळ-मृदंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयोघोष करत वारीत सहभागी होणार आहे. तसेच पालख्या आणि वारकरी २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडेल.
तसेच यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदीहून पंढरपूरसाठी रवाना होणार आहे.
पंढरपूर आगमन -२४ जुलै २०२६.
आषाढी एकादशी -२५ जुलै २०२६ (मुख्य सोहळा).
संत तुकाराम महाराज पालखी -७ जुलै २०२६ रोजी देहू येथून प्रस्थान.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मुक्काम आणि रिंगण (संक्षिप्त)
पालखी सोहळा: मुख्य टप्पे
वारीच्या मार्गावर पालखीचे होणारे मुक्काम आणि रिंगण सोहळे हे भाविकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र असतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी)
प्रस्थान: आळंदी येथून आषाढ कृष्ण अष्टमीच्या सुमारास प्रस्थान होते.
पुणे मुक्काम: पालखी पुण्यात दोन दिवस विसावते.
नीरा स्नान: माऊलींची पालखी नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते.
जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी (देहू)
प्रस्थान: देहू मुख्य मंदिरातून भजन-कीर्तनाच्या गजरात प्रस्थान.
इंदापूर रिंगण: गोल रिंगण सोहळ्यासाठी इंदापूरचे मैदान सज्ज असते.
अकलूज मुक्काम: सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा विसावा.
रिंगण आणि मुक्कामांची माहिती
आषाढी वारी २०२६- संत ज्ञानेश्वर महाराज (माउली) पालखी : मुक्काम आणि रिंगण सोहळ्यांची माहिती
पालखी ८ जुलै २०२६ (बुधवार) रोजी दुपारी ३ वाजता आळंदीहून प्रस्थान करेल आणि २४ जुलै २०२६ रोजी पंढरपूरला पोहोचेल. यात सुमारे १७ दिवस पायी प्रवास, ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण होणार आहे.
प्रमुख मुक्काम
८ जुलै: आळंदी (प्रस्थान + मुक्काम)
९-१० जुलै: पुणे (२ दिवस मुक्काम)
११-१२ जुलै: सासवड (२ दिवस)
१३ जुलै: जेजुरी
१४ जुलै: वाल्हे
१५ जुलै: लोणंद (नीरा स्नान)
१६ जुलै: तरडगाव
१७ जुलै: फलटण
१८ जुलै: बरड
१९ जुलै: नातेपुते
२० जुलै: माळशिरस
२१ जुलै: वेळापूर
२२ जुलै: भंडीशेगाव (बंधूभेट)
२३ जुलै: वाखरी
२४ जुलै: पंढरपूर (आगमन)
२५ ते २८ जुलै: पंढरपुरात मुक्काम (आषाढी एकादशी सोहळा २५ जुलै). नंतर परतीचा प्रवास.
रिंगण सोहळ्यांचे वेळापत्रक रिंगण हे वारीतील सर्वात भावपूर्ण आणि ऐतिहासिक सोहळे आहेत. वारकरी आणि सेवेकरी यात सहभागी होतात.
पहिले उभे रिंगण - १६ जुलै २०२६ (चांदोबाचा लिंब, तरडगाव जवळ)
पहिले गोल रिंगण -२० जुलै २०२६ (पुरंदवडे, माळशिरस)
दुसरे गोल रिंगण - २१ जुलै २०२६ (खुडूस/खडूस फाटा, वेळापूर)
तिसरे गोल रिंगण - २२ जुलै २०२६ (ठाकुरबुवाची समाधी, भंडीशेगाव)
दुसरे उभे रिंगण -२३ जुलै २०२६ (बाजीरावची विहीर, वाखरी)
तिसरे उभे रिंगण - २४ जुलै २०२६ (इसबावी/पंढरपूर प्रवेशादरम्यान, दुपारी)
काही ठिकाणी अतिरिक्त छोटे रिंगण किंवा पारंपरिक सोहळे होऊ शकतात. वेळापत्रकात छोटे बदल होण्याची शक्यता आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा