Publish Date: Fri, 11 Jun 2021 (12:05 IST)
Updated Date: Fri, 11 Jun 2021 (12:06 IST)
सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी मर्यादित स्वरुपात साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे सलग 2 वर्षं पंढरीची वारी नेहमी प्रमाणे होत नाहीये. सर्व मानाच्या 10 पालख्यांना वारीसाठी परवानगी यंदा देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यंदा पालखीच्या प्रस्ठानासाठी देऊ आणि अळंदीमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. प्रत्येकी 2 बसमधून यंदाही मनाच्या पालख्यांना रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्यांना वाखरीमध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रातिनिधीक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे.
तसंच शासकीय महापूजा गेल्या वर्षीप्रमाणे होणार आहे. तसंच यंदा सर्व सहभागी वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल. रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.