Publish Date: Sat, 15 Dec 2018 (09:48 IST)
Updated Date: Sat, 15 Dec 2018 (09:49 IST)
अनेक गुंडांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेणारे व आम्ही वाल्याचा वाल्मीकी करतो, असे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता गुंडांसोबतच विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींचे समर्थन करत आहेत. हा विजय मल्ल्याचाही वाल्मीकी करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आता मल्ल्याचे समर्थन करून त्यांनाही भाजपात प्रवेश दिला जाणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. नाहीतरी मल्ल्या दोन वेळा भाजपाच्या मदतीनेच खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. मल्ल्या पळून जाण्याच्या आदल्या दिवशी जेटली यांना भेटला होता. त्याच्याविरोधात सीबीआयने काढलेल्या लूक आऊट नोटीसमध्ये बदल करून ‘धरावे’ या शब्दाऐवजी ‘पहावे’ हा शब्द घालण्यात आला. पेशवाईत ‘ध’ चा ‘मा’ केला होता येथे ‘ध’चा ‘प’ केला, असे चव्हाण म्हणाले.