राज्यात कोरोनाचा प्रादुर्भात वाढत असल्यामुळे मंगळवारपासून मोठ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला आहे.
सगळेच कोरोना युद्धात झोकून काम करत होते. पोलीस, डॉक्टर, शासकीय कर्मचारी सगळेच काम करत होते. आपण एका धीराने ही लढाई लढत होतो. आता पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. दुसरी लाट आली की नाही, याबाबत अजूनही निदान झालेले नाही. आपण अनलॉक केले. सगळे हळूहळू सुरु केले. मात्र, गर्दी टाळण्याची गरज आहे. आपण कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.