Publish Date: Wed, 28 Aug 2019 (16:41 IST)
Updated Date: Wed, 28 Aug 2019 (16:43 IST)
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात उसावर सरसकट बंदी आणावी अशी शिफारस विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. उसावर बंदी आणली तर मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाला फायदा होईल असं या अहवालात मांडण्यात आलं आहे.
मराठवाड्यात उसावर आणि साखर कारखान्यांवर सरसकट बंदी आणावी असा अहवाल औरंगाबाद विभागीय कार्यालयानं राज्य सरकारला दिला आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, त्य़ात उसानं मराठवाड्याच्या पाण्यावर मोठा डल्ला मारला आहे. त्यामुळं ऊस मराठवाड्यासाठी परवडणारा नाही अशी शेरा या अहवालात मारण्यात आला आहे.
मराठवाड्यात ३.१३ लाख हेक्टरवर ऊस पिकवला जातो, त्याला प्रति हेक्टर सरासरी १९६.७८ लाख लिटर पाणी लागंत. याचंच गणित मांडल तर एकूण ६ हजार १६९ दशलक्ष घनमीटर पाणी लागतं. म्हणजे २१७ टीएमसी एवढं पाणी लागतं. हे पाणी जायकवाडी धरणाच्या क्षमतेच्या दुप्पट आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात उसावर बंदी आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मराठवाड्यात उसाला दिलं जाणारं पाणी इतरत्र वळवल्यास ३१ लाख हेक्टरील पिकांना त्याचा लाभ होईल. तर तब्बल २२ लाख शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल असं निरीक्षण समोर आलं आहे.