Publish Date: Mon, 21 Feb 2022 (15:06 IST)
Updated Date: Mon, 21 Feb 2022 (15:07 IST)
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या आयोगाने याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवला होता. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष नोंदवण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण त्यापूर्वीच आज शरद पवारांनी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर साक्ष नोंदवली आहेत. याप्रकरणात शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण शरद पवारांची साक्ष याप्रकरणात महत्त्वाची मानली जात आहेत.
यापूर्वी जुलै महिन्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांनी साक्ष नोंदवली होती. त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांनी साक्ष नोंदवली आहेत. शरद पवारांच्यानंतर तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले आणि पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेंगांवकर यांची देखील साक्ष नोंदवली जाणार आहेत.
शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भीमा कोरेगाव हिंसाचार भडकल्याचे वक्तव्य केले होते. मग याप्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने समन्स पाठवून शरद पवारांची साक्ष नोंदवली आहेत.