Publish Date: Sat, 08 Jan 2022 (08:21 IST)
Updated Date: Tue, 27 Sep 2022 (17:31 IST)
नागपूरमध्ये 2021 च्या अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. नागपूरमध्ये राबवण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भरतीच्यावेळी उमेदवारांच्या जागी वेगळ्याच लोकांनी शारीरिक (Physical) आणि लेखी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक संपूर्ण टोळीच अशा पद्धतीने उमेदवारांना पास करुन देण्यासाठी खोटी लोक परीक्षेत बसवत असल्याचा हा प्रकार आहे.
नागपूर पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नागपूर गुन्हे शाखेने तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी औरंगाबादमधील असल्याचे समजतेय. ज्या उमेदवारांसाठी यांनी हा सगळा कट रचला, ते उमेदवार देखील औरंगाबाद परिसरातील आहेत. महत्त्वाचे म्हणजे या टोळीने उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून तब्बल 12 ते 15 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
असा झाला पर्दाफाश
परीक्षा झाल्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेचे व्हेरिफिकेशन करताना पोलिसांना अर्ज भरलेल्या उमेदवाराचा चेहरा आणि परीक्षार्थींचा चेहरा यामध्ये फरक लक्षात आला आणि हा घोटाळा उघडकीस आला.सध्या असे 5 उमेदवार लक्षात आले आहे की ज्यांच्या जागी इतर कोणीतरी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला.
या टोळीतील इतर सदस्य, तसेच खोटे उमेदवार परीक्षेत बसवणारे आणि पोलीस होऊ पाहणारे तरुण,यांचा आकडा तपासात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याशिवाय ही टोळी कधीपासून अशा प्रकारे भरती करत होती तसेच कोण कोणत्या परीक्षेत सक्रिय होती हे तपासात उघड होण्याची शक्यता आहे.