Publish Date: Tue, 20 Sep 2022 (09:07 IST)
Updated Date: Tue, 20 Sep 2022 (09:12 IST)
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्याने, या दाव्या-प्रतिदाव्यांमधील तथ्य शोधणे कठीण असले, तरी या निकालांचा एकूण कल हा भाजप; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याचे दिसते.
शिंदे-फडणवीस या दोघांचा आकडा हा 185वर; तर महाविकास आघाडीचा आकडा हा 225वर गेल्याचे दिसते. अशा वेळी पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही काही ठिकाणी अनपेक्षित विजय मिळवला असताना, शिवसेना आणि काँग्रेसला मात्र वैयक्तिक्तरीत्या काही ठिकाणी फटका बसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे.
राज्यात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची जी काही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली, त्यानुसार 494 पैकी 144 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.
'राष्ट्रवादी'कडे 126, शिंदे गटाला 41, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 37, तर काँग्रेसला 62 जागा मिळाल्या आहेत, तर इतरांनी 88 जागांवर सरशी घेतली आहे.