Publish Date: Tue, 27 Jun 2023 (20:57 IST)
Updated Date: Tue, 27 Jun 2023 (21:03 IST)
नाशिक येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी फाट्यावर रात्री अकराच्या सुमारास दुचाकी आणि परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात शिरवाडे वणी गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवाडे वणी फाट्यावर रात्री अकराच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच.१७ बी.आर.७९७२) हिला नाशिककडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक (एमएच २० बी.एल.२४६१) ने जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे दुचाकी लांब फरफटत गेल्याने अपघातात दुचाकीवर बसलेले नितीन भास्कर निफाडे (३२), मयुर चंद्रकांत निफाडे (३५), सुभाष माणिकराव निफाडे (३६) यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच बसचालक दिपक शांताराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातात मयत झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील होते. तसेच या तिघांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह शिरवाडे वणी गावावर शोककळा पसरली असून तिघांवर आज सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.