Publish Date: Sun, 29 Jan 2023 (10:39 IST)
Updated Date: Sun, 29 Jan 2023 (10:48 IST)
“सर्वच आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय,” असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. मिश्कील स्वरुपात केलेल्या या टिप्पणीवरुन बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या लांबत असलेल्या विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
मंत्रिमंडळाबाबत बच्चू कडू म्हणाले, “मी नाराज आहे असे माझ्याकडे पाहून वाटते का, सर्वच आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय.”
तसंच, बच्चू कडू म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी कालच नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि भाजपची युती होईल.”
सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी दोघेच मंत्रीमंडळात होती. त्यानंतर विरोधकांकडून डागण्यात आलेल्या टिकास्त्रांनंतर 20 मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, तेव्हापासून पुढील मंत्रीमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
Published By- Priya Dixit