Publish Date: Tue, 19 Apr 2022 (20:11 IST)
Updated Date: Tue, 19 Apr 2022 (20:14 IST)
वाढत्या उष्णतेमुळे अंगाची सध्या लाही लाही होत असताना राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department)वर्तवली आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुढील 2 दिवसांत अर्थात 21 आणि 22 एप्रिलला विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचं अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.संध्याकाळनंतर अचानक वादळी वारा आणि विजांसह पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आजही राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.