Publish Date: Mon, 17 Mar 2025 (16:51 IST)
Updated Date: Mon, 17 Mar 2025 (16:57 IST)
भिवंडीतील शिवक्षेत्र मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठाच्या उद्घटनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आपल्या देशातील आवडता देवांच्या मंदिराला भेट देऊ शकतो. त्यांनी देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाशिवाय कोणत्याही देवतेचे दर्शन पूर्ण होत नाही.
केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला आहे. या मध्ये संगमेश्वर राजवाड्याचा देखील समावेश आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांना विश्वासघाताने ताब्यात घेतले होते. या किल्ल्याचा ताबा राज्य सरकार घेऊन त्याचा विकास करणार आहे.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही. जर असे कोणी केले तर त्यांच्यासाठी कडक इशारा आहे. त्याला सोडणार नाही.
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषद आक्रमक झाले असून राज्यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. या साठी विहिंप आणि बजरंगदलच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या कबरी जवळ कोणी जाऊ नये या साठी त्याच्या भोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.