Publish Date: Fri, 01 May 2020 (10:34 IST)
Updated Date: Fri, 01 May 2020 (10:37 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत चर्चा झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एकीकडे, मुख्यमंत्री-राज्यपाल यांची भेट झाली असतानाच दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगानी ही बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात येत आहे. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.