Publish Date: Thu, 25 Jan 2024 (11:07 IST)
Updated Date: Thu, 25 Jan 2024 (11:08 IST)
राज्यात बुधवारी किमान तापमानात घट होऊन उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारठ्यात वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये वाढलेल्या थंडीचे परिणाम महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसून येत आहे. राज्यातील नाशिकमध्ये 9 तर नगरमध्ये 9.3 तसेच जळगाव येथे 9.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून पुणे शहरात देखील यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तसेच येणार्या दिवसांमध्ये राज्यात गारठा राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ढगांचे सावट असून अवकाळीचा इशारा आहे तर राज्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाच मोठी घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही धुळे, नाशिक, निफाड, जळगाव आणि पुण्यामध्ये तापमान 10 अंशांच्याही खाली येऊ शकते. राज्याच्या विविध भागांत पहाटे धुके पडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.