Publish Date: Wed, 07 Dec 2016 (17:25 IST)
Updated Date: Wed, 07 Dec 2016 (17:27 IST)
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोक, शेतकरी, मजूर यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ना चिठ्ठी, ना कोई संदेश, लगाके लाईन मे देस, तुम चले गये परदेस हे आता चालणार नाही असे म्हणत नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी निघून गेल्याबाबत टिपण्णी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी तसेच गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, चांदया पासून बांद्यापर्यंतच्या माणसाला फटका बसला अशा या विषयावर चर्चा होत आहे. रांगेत काळे पैसेवाले कोणी नव्हते तर गरीब लोक रांगेत होती. देशातील १२५ कोटी लोक आज रांगेत आहेत. काळा पैसा आला की नाही ते माहीत नाही पण या रांगांमुळे ७० लोकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. राज्यातले १२ लोक बळी गेले त्यांना जबाबदार कोण आहे, असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या मृत्यूला जबाबदार कोण ? ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री नोटबंदीला आर्थिक स्वातंत्र्य लढा म्हणत असतील, तर त्यामुळे जे बळी गेले ते शहीद नाहीत का, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.