Publish Date: Sat, 11 Jun 2022 (08:14 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2022 (19:36 IST)
राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली आहे. आता सात वाजून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत संतप्त झाले आहेत. संजय राऊत
यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला.
संजय राऊत यांनी अजय माकन यांनी हरियाणातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. भाजपने खालच्या दर्जाचे राजकारण करत राज्यसभेची मतमोजणी रोखून धरल्याचे माकन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावर रिप्लाय देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. खालच्या दर्जाचे राजकारण, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!, असे आणखी एक ट्विटही संजय राऊत यांनी केले आहे.