Publish Date: Sat, 19 Feb 2022 (21:36 IST)
Updated Date: Sat, 19 Feb 2022 (21:37 IST)
श्रेयवादावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. नेते मंडळी काही झाले तर श्रेय घेत असतात. एखाद्याच्या घरात मुलगा झाला तर ते आमच्या कृपेनेच झाला असल्याचे म्हणतात आणि श्रेय घेत असतात. राज्य सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचारावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता देवेंद्र फडणवीसांनी श्रेय घेण्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. फडणवीस विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात संबोधित केले आहे.
भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींबातच्या निमांना मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. या कामांचे श्रेय घेण्यासाठी अंमलजबाणी रखडवली गेली का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, कशाचेही श्रेय ते घेतात, एखाद्याच्या घरात लग्न असेल तर तसेच एखाद्याच्या घरात मुलगा झाल्यास तो आमच्या प्रेरणेने झाला. अशा प्रकारचे वेगवेगळे श्रेय घेण्याचे अनेकांचा प्रयत्न असतो. ज्याचे त्याचे श्रेय हे ज्याला त्याला मिळत असते आणि लोक ते देत असतात. आपण फक्त काम करत राहायचे असते असा टोला फडणीसांनी लगावला आहे.